नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

राज्यात 61 हजार पोलिसांची भरती करणार

Saturday, November 09, 2013 AT 04:15 AM (IST)

कऱ्हाड - राज्यात 61 हजार पोलिस कर्मचाऱ्यांच्या पदनिर्मितीच्या गृह विभागाच्या प्रस्तावाला शासनाने नेमलेल्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीची मान्यता मिळाली आहे. लवकरच तो प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी ठेवला जाईल. त्यानंतर पोलिस भरतीला प्रारंभ होईल, अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, राज्यात 61 हजारहून अधिक पोलिसांची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील वाढत्या "क्राईम रेट'संदर्भात ते म्हणाले,"" लोकसंख्या वाढल्याने "क्राईम रेट' वाढत आहे. त्यासाठी जिल्ह्यात पोलिस ठाणी वाढवण्याची गरज असून, आणखी चार पोलिस ठाण्यांची आवश्‍यकता आहे. सुरवातीच्या टप्प्यात दोन व नंतर दोन यानुसार त्याला मंजुरी मिळेल. मात्र, ठाणी वाढली की मनुष्यबळ नेमणे, त्यांना प्रशिक्षण देणे या बाबींना विलंब लागेल. नव्याने 61 हजार पदनिर्मितीतील कर्मचारी जिल्ह्याला लोकसंख्येप्रमाणे मिळतीलच. काही पोलिस ठाण्यात अकार्यक्षम कर्मचारी असून, बदलीच्या कायद्यामुळे त्यांना बदलणेही अवघड होत असल्याने त्याचा "क्राईम रेट'वर परिणाम होताना दिसतो. मात्र, जिल्ह्यातील वाढत्या "क्राईम रेट'ची गांभीर्याने दखल घेतली असून, लवकरच वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊ.''

शेतकरी संघटनेच्या ऊस दरासंदर्भातील आंदोलनासंदर्भात ते म्हणाले,"" कारखानदारांनी आंदोलन होण्यापूर्वीच एकत्र बसून दर निश्‍चित करावा. जनतेला वेठीस धरून कोणी आंदोलन करणे उपयोगाचे होणार नाही. शांततेच्या मार्गानेही आंदोलन करण्यास आमचा निर्बंध नाही. मात्र, वाहनांची नासधूस करणे, महामार्ग रोखणे असे योग्य नाही. या वर्षी आंदोलनाचे स्वरूप लक्षात घेऊन मनुष्यबळ वाढवले जाईल. मात्र, संघटनांनी शांततेने घेण्याची गरज आहे.'' नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी दिवाळीची शुभेच्छापत्र इंग्रजीत पाठविल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी केल्याच्या प्रश्‍नावर ते म्हणाले,"" त्यासाठी राजीनामा मागण्याची आवश्‍यकता नसून पुढच्यावेळी मंत्री सामंत मराठीतून शुभेच्छापत्रे पाठवतील.''
या वेळी आमदार बाळासाहेब पाटील, नगराध्यक्षा उमा हिंगमिरे, उपाध्यक्ष राजेंद्र यादव, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील उपस्थित होते.

सूत्रधारांनाही पकडू.... अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात ते म्हणाले, ""तपास पूर्ण झाल्यावर सर्व परिस्थिती लोकांसमोर ठेवली जाईल. त्या प्रकरणाच्या तपासातील जेवढे मनुष्यबळ आहे, तेवढे आजही त्याच तपासासाठी कार्यरत असून, अंतिम तपास होत नाही, तोपर्यंत त्यांना अन्य कोणतेही काम दिले जाणार नाही. आरोपींनी कितीही दक्षता घेतली तरी काही तरी उणीव राहतेच. त्याचेच काम पोलिस करत आहेत. त्यामुळे या प्रकरणातील मारेकऱ्यांना तर पकडूच पण, त्यांच्या सूत्रधारांनाही पकडले जाईल.''